Mostly सोबत प्रवास करताना तसं पाहता दोघांतल अंतर कमी
व्हायला हवं. पण जिथे मनं जुळलेली किवा नीट सांभाळलेली नसली की कदाचित सोबत प्रवास
करून उलट अंतर वाढल्याचं चित्र दिसतं. अंतर वाढतंय असं कळत असुन सुद्धा जेव्हा, ते नंतर
ठिक होईल किवा ते वाढलेलंच नाही या आविर्भावात जेव्हा माणसं जगायला लागतात तेव्हा
खरा त्रास सुरु होतो असं मला वाटतं. आणि मग जे सुखी असण्याचं सोंग ओढलेलं असतं ते
खरं व्हावं याच आशेवर पुढला प्रवास सुरु राहतो.पण टाळी जशी एका हाताने वाजत नाही
त्याच प्रमाणे जर प्रवास करणारे दोघंही जर प्रयत्नशील असतील तर चित्र बदलायला वेळ
लागत नाही. पण जेव्हा ती फक्त एकाचीच गरज होऊन बसते तेव्हा मात्र दुसऱ्याची फक्त
फरफट, आयुष्भर. नाही, सगळं झुगारून देऊन
मुक्ती ही मिळवू शकते एखादी व्यक्ती पण तसं जर नाही केलं तर मात्र फक्त निव्वळ
आशेवर दिवस ढकलले जातात. दिवसाचे आठवडे आणि आठवड्याचे वर्ष. जे स्वप्नातलं सत्य
असतं ते शेवट पर्यंत, रेल्वे चे रूळ जसे एकमेकाला दिसतात पण न भेटता
समांतर राहतात, तसं फक्त विचारात दिसतं पण भेटत नाही. अशा
परिस्तिथीत एक विशिष्ट वेळेनंतर मग कळून चुकतं की बहुतेक आता सगळं सुधारण्यापलीकडे
आहे आणि आहे ते (कटू) सत्य मान्य करण्यापलीकडे हाती काहीही उरत नाही. याच आशयाची
एक कविता सुचली होती काही दिवसापुर्वी.
टीप - हा स्वानुभव नसुन
सभोवतालचे निरीक्षण आहे.
अंतर
अंतर वाढले प्रवास करता
सोंग ओढले नेहेमिच स्मरता
सोंगाचे सत्यात रूपांतर होण्या
केल्या अगणित अनंत विनवण्या
सत्य राहिले नेहमी समांतर
वाटायचे भेटेल कधीतरी नंतर
कोरडी कदाचित राहील पाटी
कथा माझीच की ही जगराहाटी??
सारंग कुसरे
No comments:
Post a Comment